Published October 27, 2023 | Version v1

महात्मा गांधीजींची विश्वस्त संकल्पना

  • 1. विभाग प्रमुख, लोकप्रशासन विभाग, पुण्यश्लोक अहिल्यादेव होळकर महाविद्यालय, राणीसावरगाव ता. गंगाखेड जि. परभणी ४३१५३६ महाराष्ट्र, भारत

Description

सत्य व अहिंसेवर प्रेम करणारे महात्मा गांधी जगप्रसिद्ध आहेत. त्यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी हे होय. महात्मा गांधींचा जन्म काठेवाडात पोरबंदर येथे 2 ऑक्टोबर 1869 रोजी झाला. त्यांचे वडील करमचंद हे पोरबंदर संस्थानचे दिवाण होते. आणि आई पुतळीबेन अतिशय धार्मिक प्रवृत्तीच्या होत्या. वडील रोज भगवद्गीतेचे पठण करत आणि आई पूजापाठ केल्याशिवाय कधी भोजन करत नसे.बालपणी महात्मा गांधींना काही वाईट मुलांची संगत लागली. परंतु त्यांना अल्पावधीतच आपल्या वागण्याचा पश्चाताप झाला. त्यानंतर त्यांनी सत्संगती कधी सोडली नाही. वडिलांनी आणलेले पितृभक्तीचे नाटक एकाग्रतेने वाचले आणि राजा हरिश्चंद्राचे नाटक पाहिले. हरिश्चंद्राच्या सत्यपालनाचा त्यांच्या मनावर फार परिणाम झाला. हरिश्चंद्रासारखे आपणही सत्यवादी व्हावे असे त्यांना वाटू लागले. लहानपणी त्यांना भुताची भीती वाटत असे त्यावेळी आईने त्यांना राम नामाचा जप करण्यास सांगितले. पुढील जीवनात फार उपयोग झाला. तसेच तुलसी रामायणाच्या वाचनाने ईश्वरभक्तीची ज्योत त्यांच्या हृदयात प्रचलित झाली.

वयाच्या तेराव्या वर्षी त्यांचा विवाह कस्तुरबांशी झाला. 1885 मध्ये त्यांचे वडील वारले आणि दोन वर्षानंतर ते मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यांच्या वडील भावाने त्यांना बॅरिस्टर होण्यासाठी इंग्लंडला पाठवण्याचे ठरवले पण आईची परवानगी नव्हती. मात्र महात्मा गांधींनी मी अमली पदार्थांचे सेवन करणार नाही. अभक्ष भक्षण करणार नाही. परस्त्रीला स्पर्श करणार नाही. असे आईला वचन देऊन ते इंग्लंडला गेले. जून 1891 साली महात्माजी बॅरिस्टर पदवी घेऊन भारतात आले. त्यांनी मुंबई येथे वकिलीचा व्यवसाय सुरू केला. मात्र त्यांच्या वकिलीच्या व्यवसायाला फारसे यश मिळाले नाही. विलक्षण बुद्धिमत्ता असलेल्या गांधींजींना दक्षिण आफ्रिकेतील एका कृष्णवर्णीय व्यापाऱ्याने आपला दावा चालवण्यासाठी एक वर्षाच्या कालावधीसाठी दक्षिण आफ्रिकेत नेले. अत्यंत कौशल्याने महात्माजींनी कृष्णवर्णीय व्यापाराला न्याय मिळवून दिला. दक्षिण आफ्रिकेतील एका वर्षाच्या कालावधीत महात्माजींना प्रस्थापित शासनाच्या अन्यायकारक जुलमी धोरणाची माहिती झाली. कृष्णवर्णी यांना न्याय मिळावा या उद्देशाने महात्मा गांधींनी दक्षिण आफ्रिकेतील भारतीयांना संघटित केले. प्रस्थापित शासनाच्या विरोधात सत्याग्रह केला. गौरवर्णीयांप्रमाणेच कृष्णवर्णी यांना वागणूक मिळावी यासाठी महात्माजींनी जे कार्य केले ते सुवर्णाक्षरात कोरण्यासारखेच आहे.

गांधींजीनी बुद्धचरित्र आणि भगवद्गीता वाचली. गीतेचे सखोल चिंतन केले व त्यातील विचारांचा त्यांच्यावर सखोल परिणाम झाला. टॉलस्ट्रॉलचे 'वैकुंठ माझ्या हृदयात आहे' नावाचे पुस्तक वाचले. रास्किनचे चे 'सर्वोदय' हे पुस्तक जाणून घेतले. सर्वांच्या कल्याणात आपले कल्याण सामावलेले आहे याची त्यांना जाणीव झाली. बौद्धिक शिक्षणापेक्षा त्यांना हृदयाच्या शिक्षणाला म्हणजे चारित्र्याच्या विकासाला प्रथम स्थान दिले. त्यांना सत्याचा आणि अहिंसेचा मार्ग अधिक श्रेष्ठ वाटत होता. हिंसेपेक्षा अहिंसेमध्ये प्रचंड सामर्थ्य आहे याची त्यांना जाणीव होती. त्यांची राहणी साधी होती पण विचारसरणी उच्च होती. त्यांना फिरोजशहा मेहता हिमालयासारखे वाटले, लोकमान्य टिळक समुद्रासारखे व नामदार गोखले गंगेसारखे वाटले.

भारतात मजुरांवर होणारा अन्याय त्यांनी पाहिला व तो त्यांनी दूर केला. सत्याग्रह, सविनय कायदेभंग, शस्त्राशिवाय प्रतिकार, असहकार अशा नवीन साधनांचा पुरस्कार केला. देशातील विषमतेची दरी दूर करण्याच्या उद्देशाने विश्वस्त सिद्धांत मांडला. हिंदू मुसलमान यांच्यातील संबंध चांगले राहावे म्हणून त्यांनी प्रयत्न केले. जातिभेद त्यांना मान्य नव्हता. त्यासाठी त्यांनी अनेक उपोषणे केली. अस्पृश्यांना 'हरिजन' असे नाव दिले. हे सर्व कार्य ते निस्वार्थ बुद्धीने करत होते. गीतेतील निष्काम कर्मयोग ते आचरत होते. जनतेने त्यांना महात्मा ही उपाधी दिली राष्ट्रपिता म्हणून त्यांना सन्मानित करण्यात आले.

महात्माजींचे कार्य पाहून स्वातंत्र्यासाठी सारी जनता त्यांच्या मागे उभी राहिली. 1942 साली 'चले जाव', 'भारत छोडो' असे इंग्रजांना त्यांनी ठणकावून सांगितले. भारतीय जनता आता जागृत झाली होती. इंग्रजांनी लाठीमार, गोळीबार केला. अनेकांना तुरुंगात घातले, पण इंग्रजांचे काही चालले नही.1947 ला देश स्वतंत्र झाला. भारताची फाळणी झाली. भारताची फाळणी अनेक लोकांना अयोग्य वाटली. परिणामी एका तरुणाने दिल्लीत गांधीजींना प्रार्थना करीत असताना गोळी मारून ठार केले. गांधीजींच्या मुखात त्यावेळीही 'हे राम' हे शब्द होते. त्यांना हुतात्म्याचे मरण आले. सत्य, अहिंसा आणि सत्याग्रह या त्रिसूत्रीचा पुरस्कार करणाऱ्या महात्मा गांधींना 19व्या शतकातील एक महामानव साऱ्या जगाने मानले. त्यांचा मृत्यू 30 जानेवारी 1948 रोजी दिल्ली येथे झाला.

Files

20230104297301089.pdf

Files (650.2 kB)

Name Size Download all
md5:8d1c07e53f4f47acb9a1943a8048d241
650.2 kB Preview Download